निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दिवाळीपासून मानधन रखडले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुपाशी व निराधार योजनेचे लाभार्थी उपाशी या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे. राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच लाभार्थ्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांनी लाभार्थ्यांच्या माध्यमातून तहसीलदार यांना केली. निराधार योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या, संजय गांधी निराधार, घटस्फोटीत, वयोवृद्ध अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे.
शासनाकडून मिळणारे या योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे. लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून तातडीने दर महिन्याला मानधन दिले जाते. परंतु, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाअभावी शासनाने अडचणीत आणले आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन, या योजनांचा तुमसर तालुक्यातील अनेक निराधार लाभार्थी लाभ घेत आहेत. ज्यांना आठ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, अशा लाभार्थ्यांनी काय करावे? कसे जीवन जगावे? कशाप्रकारे आपल्या औषधांची सोय करावी? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.









