महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी मुंबई नाशिक पुणे नगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली असली तरी विदर्भाकडे विशेष करून भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला तरीही भंडारा जिल्ह्यात 18 टक्के पाऊस पडला आहे.
धानाचा कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यावर वरुणराजा नाराज झाल्याचं चित्र सद्या पहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या विभागात दमदार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे विदर्भाकडे पावसाने पाठ फिरविल्याचे पहायला मिळत आहे. जून महिना संपत आला असला तरी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 18 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेरी सुद्धा ओली झाली नाही. जून महिन्यात शेतकरी शेतावर धानाची पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळतो पण सद्या स्थितीत शेतकरी शेताकडे फिरकत नसल्याने शेती विरान असल्याचं चित्र दिसत आहे. म्हणून वरुण राज्याची कृपा जिल्ह्यावर कधी होईल व शेतकरी कधी शेतावर काम करताना दिसेल यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे पाहत आहेत.
