पवनी येथील रास्तभाव दुकानातून फेब्रुवारी २०२५ मधील दुकानातील १२३ शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य वितरित केले नसल्याची तक्रार पवनी येथील तहसील कार्यालयात केली होती. त्यानुसार निरीक्षण अधिकारी अर्चना शहारे यांनी दुकानाची तपासणी केली व ३२ लाभार्थ्यांचे बयान नोंदविले. यावेळी या दुकानदाराने लाभार्थ्यांना फेब्रुवारी २०२५ महिन्याचे अन्नधान्य वितरित केले नसल्याचे सांगण्यात आले. तपासणीमध्ये ११.०३ क्विंटल गहू, २०.७७ क्विंटल तांदूळ व २० किलो साखर कमी आढळून आल्याचा अहवाल निरीक्षण अधिकारी पवनी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सादर केला. या अहवालानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पवनी येथील रास्तभाव दुकानदार जमील खॉ रमजान खान पठाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला मात्र दुकानदाराने खुलासा सादर करताच हा खुलासा असमाधानकारक असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या रास्तभाव दुकानदाराचे प्राधिकारपत्र रद्द केले व संपूर्ण अनामत रक्कम जमा करण्याचे आदेशित केले. सोबतच कमी आढळून आलेल्या धान्याचे १ लाख २४ हजार ८४६ रुपये वसूल करण्याचे आदेश पारित केले आहेत.










